।। श्री ।।
।। श्रीराम समर्थ ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
जनी सर्व सुखी असा कोण ।
आहे विचारे मना तुंचि शोधूनी पाहे ।।
मना त्वांची रे पूर्व संचित केले ।
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले ।।११।।
मना मानसीं दुःख आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।।
विवेके देहबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणें मुक्ती भोगीत जावी ।।१२।।
मना सांग पा रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले ।।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
बळे लागला काळ हा पाठी लागी ।।१३।।
जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला ।
परी शेवटी काळमुखी निमाला ।।
महाथोर ते मृत्यु पंथेची गेले ।
किती एक ते जन्मले आणि मेले ।।१४।।
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।
जीता बोलती सर्वही जीव मी मी ।।
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनीया सर्व जाती ।।१५।।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ।।
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणुनी जनी मागुता जन्म घेते ।।१६।।
मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊनी जाते ।।
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतिमंद ते खेद मानी वियोगें ।।१७।।
मना राघवेंवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे ।।
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणें ।
तया वर्णिता सर्व ही श्र्लाघ्यवाणे ।।१८।।
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।।
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावें ।।१९।।
बहु हिंपुटी होईजे मायेपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ।।
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमुख रे दुःख त्या बाळकासीं ।।२०।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा