श्री मनाचे श्लोक ९१ ते १००


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।



 








।। श्री मनाचे श्लोक ९१ ते १०० ।। 




नको वीट मानू रघुनायकाचा ।

अती आदरे बोलिजे राम वाचा ।

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।

करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।। ९१ ।।

 

 

अती आदरे सर्वही नामघोषे ।

गिरिकंदरे जाईजे दूरी दोषे ।।

हरी तिष्ठतू तोषला नामतोषे ।

विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।

 

 

 

जगी पाहता देव हा अन्नदाता ।

तया लागली तत्त्वता सार चिंता ।।

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।

मना सांग पां रे तुझे काय वेचे ।। ९३ ।।

 

 

तिन्ही लोक जाळू शके कोप येता ।

निवाला हरू तो मुखे नाम घेता ।।

जपे आदरे पार्वती विश्वमाता ।

म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ।। ९४ ।।

 

 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।

तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।।

शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।

मुखे बोलता ख्याति जाली पुराणी ।। ९५ ।।

 

 

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।

जपे रामनामावळी नित्यकाळी ।।

पिता पापरूपी तया देखवेना ।

जनी दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।। ९६ ।।

 

 

मुखी नाम नाही तया मुक्ति कैची ।

अहंतागुणे यातना ते फुकाची ।।

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।

म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ।। ९७ ।।

 

 

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।

बहू तारिले मानवदेहधारी ।।

तया रामनामी सदा जो विकल्पी ।

वदेना कदा जीव तो पापरूपी ।। ९८ ।।

 

 

 

जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।

तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ।।

मुखे रामनामावळी नित्यकाळी ।

जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ।। ९९ ।।

 

 

यथासांग रे कर्म तेही घडेना ।

घडे कर्म ते पुण्य गांठी पडेना ।।

दया पाहता सर्वभूती असेना ।

फुकाचे मुखी नाम तेही वसेना ।। १०० ।।



।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक ८१ ते ९०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।


 








।। श्री मनाचे श्लोक ८१ ते ९० ।। 



मना मत्सरे नाम सांडू नको हो ।

अती आदरे हा निजध्यास राहो ।।

समस्तामधे नाम हे सार आहे

दुजी तूळणा तूळिताही न साहे ।। ८१ ।।

 

 

बहू नाम या रामनामी तुळेना

अभाग्या नरा पामरा हे कळेना ।।

विषा औषध घेतले पार्वतीशे ।

जिवा मानवा किंकरा कोण पूसे ।। ८२ ।।

 

 

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।

उमेसी अती आदरें गूण गातो ।।

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे ।

परी अंतरी नामविश्वास तेथे ।। ८३ ।।

 

 

विठोने शिरी वाहिला देवराणा ।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ।।

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी ।

जिवा सोडवी राम हा अंतकाळी ।। ८४ ।।

 

 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।

जपू नेमिला नेम गौरीहराचा ।।

स्वयें निववी तापसी चंद्रमौळी ।

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ।। ८५ ।।

 

 

मूखी राम विश्राम तेथेचि आहे ।

सदानंद आनंद सेवूनि राहे ।।

तयावीण तो सीण संदेहकारी ।

निजधाम हे नाम शोकापहारी ।। ८६ ।।

 

 

मुखी राम त्या काम बाधू शकेना ।

गुणे इष्ट धारिष्ट्य त्याचे चुकेना ।।

हरिभक्त तो शक्त कामास मारी ।

जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।। ८७ ।।

 

 

बहू चांगले नाम या राघवाचे ।

अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।।

करी मूळ निर्मुळ घेता भवाचे ।

जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ।। ८८ ।।

 

 

जनी भोजनी नाम वाचे वदावे ।

अती आदरे गद्य घोषे म्हणावे ।।

हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।। ८९ ।।

 

 

न ये राम वाणी तया थोर हानी ।

जनी व्यर्थ प्राणी तया नाम कानी ।।

हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी ।

बहू आगळे बोलिली व्यासवाणी ।। ९० ।।


।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

श्री मनाचे श्लोक ७१ ते ८०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।














।। श्री मनाचे श्लोक ७१ ते ८० ।। 


जयाचेनि नामे महा दोष जाती ।

जयाचेनि नामे गती पाविजेती ।।

जयाचेनि नामे घडे पुण्यठेवा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७१ ।।

 


न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ काही ।

मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ।।

महा घोर संसार शत्रु जिणावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७२ ।।


 

देहेदंडणेचे महादुःख आहे

महादुःख ते नाम घेता न राहे ।।

सदाशीव चींतीतसे देवदेवा 

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७३ ।।

 

 

बहुंतापरी संकटे साधनांची

व्रते दान उद्यापने ती धनाची ।।

दिनाचा दयाळू मनी आठवावा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७४ ।।

 

 

समस्तामध्ये सार साचार आहे

कळेना तरी सर्व शोधूनि पाहे ।।

जीवा संशयो वाउगा तो त्यजवा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७५ ।।

 

 

नव्हे कर्म ना धर्म ना योग काहीं

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।।

म्हणे दास विश्वास नामी धरावा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७६ ।।

 

 

करी काम निष्काम या राघवाचे

करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।।

करी छंद निर्व्दंद हे गूण गातां

हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।। ७७ ।।

 

 

अहो ज्या नरा रामविश्वास नाही

तया पामरा बाधिजे सर्व काही ।।

महाराज तो स्वामी कैवल्यदाता

वृथा वाहणे देहसंसारचिंता ।। ७८ ।।

 

 

मना पावना भावना राघवाची ।

धरी अंतरी सोडी चिंता भवाची ।।

भवाची जिवा मानवा भुली ठेवा ।

नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ।। ७९ ।।

 


धरा श्रीवरा त्या हरा अंतराते l

तरा दुस्तरा त्या परा सागराते ।।

सरा विसरा त्या भरा दुर्भराते

करा नीकरा त्या खरा मत्सराते ll ८० ।।




।। जय जय रघुविर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...