श्री मनाचे श्लोक १९१ ते २०५


।।श्री।।

।।श्री राम समर्थ।।

।।जय जय रघुवीर समर्थ।।














देहेबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना ।

तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ।।

परब्रम्ह तें मीपणे आकळेना ।

मनी शून्य अज्ञान हे मावळेना ।।१९१।।


मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ।

दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे ।।

तया खूण ते हीन दृष्टांत पाहे ।

तेथे संग निसंग दोन्ही न साहे ।।१९२।।


नव्हे जाणता नेणता देवराणा ।

न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ।।

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।

श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ।।१९३।।


वसे हृदयीं देव तो कोण कैसा ।

पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ।

देहे टाकिता देव कोठें पाहतो ।

परि मागुता ठाव कोठे रहातो ।।१९४।।


वसे हृदयी देव तो जाण ऐसा ।

नाभाचेपरी व्यापकु जाण तैसा ।।

सदा संचाला येत ना जात काही ।

तयावीण कोठे रिता ठाव नाही ।।१९५।।


नभी वावरे जो अणुरेणू काही ।

रिता ठाव या राघवेवीण नाही ।।

तया पाहता पाहता तेचि झाले ।

तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ।।१९६।।


नाभासारिखे रूप या राघवाचे ।

मनीं चिंतिता मूळ तुटे भवाचे ।।

तया पाहता देहबुद्धी उरेना ।

सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ।।१९७।।


नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।

रघूनायका उपमा ते न साहे ।।

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे ।

तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे ।।१९८।।


अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ।

तेथे तर्क संपर्क तोही न साहे ।।

अति गूढ तें दृश्य तत्काळ सोपे ।

दुजेवीण जे खुण स्वामीप्रतापें ।।१९९।।


कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।

तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ।।

मनी  उन्मनी शब्द कुंठित राहे ।

तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ।।२००।।


कदा ओळखीमाजी दुजे दिसेना ।

मनी मानसी द्वैत काही वसेना ।।

बहुता दिसा आपली भेट जाली ।

विदेहीपणें सर्व काया निवाली ।।२०१।।


मना गुज रे तुज हे प्राप्त झाले ।

परी अंतरी पाहिजे यत्न केले ।।

सदा श्रवणें पाविजे निश्चयासी ।

धरी सज्जन संगती धन्य होसी ।।२०२।।


मना सर्वही संग सोडूनि द्यावा ।

अति आदरे सज्जनाचा धरावा ।।

जयाचेनि संगे महादुःख भंगे ।

जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ।।२०३।।


मना  संग हा सर्व संगास तोडी ।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ।।

मना संग हा साधना शीघ्र सोडी ।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी ।।२०४।।


मनाची शते ऐकता दोष जाती ।

मती मंद ते साधना योग्य होती ।।

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।

म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी ।।२०५।।



।। जय जय रघुवीर समर्थ ।।


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...