श्री मनाचे श्लोक ५१ ते ६०


।। श्री ।।

।। श्रीराम समर्थ ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।




।। श्री मनाचे श्लोक ५१ ते ६० ।।


मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी 

प्रपंचीक नाही जयाते उपाधी 

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५१ 


क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे 

न लिंपे कदा दंभवादे विवादे 

करी सुखसंवाद जो ऊगमाचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५२ 


सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी 

सदासर्वदा सत्यवादी विवेकी 

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५३ 


सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी 

मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी 

चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा 

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा  ५४ 


नसे मानसी नष्ट आशा दुराशा 

वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा 

ऋणी देव हा भक्तीभावे जयाचा 

जगी धन्य तो दास सर्वोतमाचा  ५५ 


दिनाचा दयाळू मनाचा मवाळू 

स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू 

तया अंतरी क्रोध संताप कैचा 

जगी धन्य तो दास सर्वोतमाचा  ५६ 


जगी होईजे धन्य या रामनामे 

क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे 

उदासीनता तत्वता सार आहे 

सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे  ५७ 


नको वासना विषयी वृत्तिरुपे 

पदार्थी जडे कामना पूर्वपापे 

सदा राम निष्काम चिंतित जावा 

मना कल्पनालेश तोही नसावा  ५८ 


मना कल्पना कल्पिता कल्पकोटी 

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी 

मनी कामना राम नाही जयाला 

अती आदरे प्रीति नाही तयाला  ५९ 


मना राम कल्पतरू कामधेनू 

निधी सार चिंतामणी काय वानू 

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता 

तया साम्यता कायसी कोण आता  ६० 



।। जय जय रघुवीर समर्थ ।।

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चौदावा अध्याय श्री सद्गुरू चरित्र

 ||श्री गणेशाय नमः|| ||श्री सरस्वतेय नमः|| ||श्री सद्गुरुभ्यो नमः|| नामधारक शिष्य देखा | विनवी सिद्धासी कवतुका | प्रश्न करी अति विशेखा | एक ...